Tuesday 16 October 2012




गुड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स!



केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांसाठी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय), सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात हेच प्रमाण शंभर टक्के असेल. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ४९ टक्के, प्रसारण क्षेत्रात ७४ टक्के, विमा क्षेत्रात २६ वरून ४९ टक्के, तर पेन्शन क्षेत्रातही परकी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशाच्या आर्थिक धोरणांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्या पार्श्‍वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले, हे आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. 

रुपयाची घटती बाह्य किंमत, अर्थसंकल्पातील वाढती तूट, युरोप-अमेरिकेत वाढत असलेली मंदी, अन्नधान्याचे वाढलेले भाव, आंतरराष्ट्रीय व्याापारात वाढलेली तूट, परिणामी देशी औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकातील वाढती घसरण, लक्षणीय बेरोजगारी, गुंतवणूक क्षेत्रात निर्माण झालेलं शैथिल्य अशा पार्श्‍वभूमीवर हे निर्णय केंद्र सरकारला घ्यावे लागले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विरोधामुळं सरकारला परकी गुंतवणुकीबाबत सबुरीची भूमिका घ्यावी लागली होती. हे क्षेत्र परकी गुंतवणुकीसाठी खुलं न केल्याने देशाच्या एकंदर गुंतवणुकीच्या स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला होता. अर्थसंकल्पातील काही तरतुदींमुळे तर देशातील परकी संस्थागत गुंतवणूक, तसेच परकी गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरवात केली होती. यासाठी अखेर सरकारनं आपलं अस्तित्व पणाला लावून हे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहेत. सुधारणांचे धोरण पुन्हा सुरू झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर होईल. 

विमा व पेन्शन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आल्याने हा पैसै सरकारला पायाभूत विकासासाठी वापरता येईल. या योजनांमधील पैसा मोठ्या काळापर्यंत देशातच राहणार असल्याने परदेशी कंपन्यांनी पैसै काढून घेतल्यास देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल ही भीती अनाठायी आहे. या दोन्ही क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणावर डॉलरमध्ये पैसा आल्याने रुपयाची किंमत वधारण्यासही मदत होणार आहे. मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता दिल्याने शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतमाल योग्य वेळेत बाजारपेठेत न गेल्याने होणारे सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान त्यामुळे वाचेल. कारण वॉलमार्ट, टेस्को, कॅरिफर अशा बहुराष्ट्रीय रिटेल कंपन्या हा शेतमाल थेट शेतातून घेतील. थेट विक्रेत्यांनाच शेतमाल विकणे शक्य झाल्याने मधल्या पातळीतील दलालांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक बंद होईल. त्याच बरोबर किरकोळ क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या संधी अनेक पटींनी वाढतील.

    बहुराष्ट्रीय रिटेल कंपन्या हा शेतमाल थेट शेतातून घेतील. थेट विक्रेत्यांनाच शेतमाल विकणे शक्य 
झाल्याने मधल्या पातळीतील दलालांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक बंद होईल.

रिटेल गुंतवणूकदारांना तीस टक्के खरेदी भारतातील अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांकडून करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रालाही चालना मिळेल. सिंगल ब्रँड रिटेलसाठीही याच प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्यात आली आहे. हे मॉल दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्येच परकीय कंपन्यांना सुरू करता येणार आहेत. त्यामुळे छोट्या शहरांतील व्यापार्‍यांना त्यांचा धोका नाही. दहा किलोमीटरच्या परिघात दुसरा मॉल उघडता येणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या इतर दुकांनांना स्पर्धा निर्माण होणार नाही. ग्राहकांचा ओघ छोट्यामोठ्या खरेदीसाठी लहान व्यापार्‍यांकडेच राहील. निधीचा ओघ वाढेल स्पर्धेत तग धरून उभे राहण्यासाठी उत्तम दुकाने व व्यवस्था यावर भर दिला जाईल. शासनाच्या महसूलउत्पन्नात उल्लेखनीय वाढ होईल. ग्राहकांना उपलब्ध होणार्‍या उत्पादनांत प्रचंड वैविध्य येईल. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय उत्पादने मिळू शकतील. 

परकीय गुंतवणुकीमुळे वर्षभरात सुमारे एक कोटी नोकर्‍या उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न सुटण्यास हातभार लागेल, अशी माहिती इंडियन स्टाफिंग फेडरेशनने दिली आहे. यामुळे चाळीस लाख जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल. ५०-६० लाखांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. अल्पशिक्षित आणि अल्पकौशल्यधारक कर्मचार्‍यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे किरकोळ व्यापार क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला वाव मिळाल्यास शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. छोट्या शहरांत हे मॉल उघडता येणार नसल्याने येथील छोट्या व्यापार्‍यांचा कुठलाही तोटा होणार नाही. दहा किलोमीटरच्या परिघात दुसरा मॉल उभारण्याची परवानगी नसल्याने या परिघातील छोट्या दुकानांनाही फार मोठा फटका बसणार नाही. 

या आर्थिक सुधारणा एवढ्यावरच थांबतील असं नाही. येत्या काही दिवसांत आणखी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णयही घेतले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गुंतवणूक मंडळ (नॅशनल इन्व्हेस्टमेंट बोर्ड) प्रस्तावित आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकींचे प्रकल्प अशा मंडळांकडून जलद गतीनं मान्य केले जावेत, असं अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारी कर्जे उभारण्याच्या प्रक्रिया अधिक सोप्या केल्या जाण्याचीही शक्यता आहे. अर्थसंकल्प सुधारण्यासाठी नवे करप्रस्ताव, कर्जव्यवस्थापन, अंशदान कपाती आगी उपाययोजना सुचविल्या जातील. वस्तू व सेवाकर अमलात आणण्यासाठी राज्यांकडे आग्रह धरला जाईल. सेबीसारख्या नियंत्रक संस्था भांडवली प्रभाववाढीसाठी सुधारणा करण्याची शक्यता आहे. आणखी निर्गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातील. मोठ्या गुंतवणूक प्रकल्पांना जलद मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्यात येतील. विमा कंपन्यांना पायाभूत क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. केंद्र सरकारने आतापर्यंत घेतलेले निर्णय धाडसीच आहेत. त्याची परिपूर्ण कार्यवाही कशी होईल, यावर पुढील परिणाम ठरतील. आगामी काळातही अशी पावले उचलली जाणार असल्यानं त्याला राज्यांच्या पातळीवर किती पाठिंबा मिळतो, यावर बरेच काही अवलंबून राहील. 

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागला आहे, असे निष्कर्ष असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इडस्टी ऑफ इंडिया (असोचेम) या संस्थेने राज्यांच्या केलेल्या सर्वेक्षणातून काढले आहेत. एफडीआयसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य ओडिशा ठरले आहे. या राज्यात ४९ हजार ५२७ कोटींचे एफडीआयचे प्रस्ताव आले आहेत. ओडिशाखालोखाल, आंध्र प्रदेश (३३ हजार ९३६ कोटी), गुजरात (२० हजार २५८ कोटी), छत्तीसगड (२० हजार कोटी) व कर्नाटक (१४ हजार कोटी) यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात एक हजार ४१४ कोटींचे एफडीआय प्रस्ताव आले, तरी प्रत्यक्षात १२ हजार कोटींची एफडीआय गुंतवणूक होणार आहे, असे ‘असोचेम’च्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. राज्याच्या भवितव्यासाठी या गुंतवणुकी अधिकाधिक कशा आकर्षित करता येईल, यासाठी पावलं उचलावी लागतील. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे गरजेचं आहे. भारताची अर्थव्यवस्था अधिक सशक्त करण्यासाठी केंद्रानं हे निर्णय घेतले आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेशक रूप मिळण्याची गरज आहे. देशांतर्गत विकासदर आठ टक्क्यांच्या वर जाऊन या देशातील सर्वसामान्यांचे हित त्याद्वारे जपण्याचा प्रयत्न आहे. शेवटी सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘गुड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स’ हाच सध्याच्या परिस्थितीतील योग्य उपाय ठरू शकतो. 



Tuesday 9 October 2012



‘पुणे बस दिवस’च्या निमित्ताने...



येत्या एक नोव्हेंबरला ‘पुणे बस दिवस’ राबविण्याच्या ‘सकाळ’च्या उपक्रमाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. शहरात वाढलेल्या गर्दीमुळे वाहतुकीच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विविध कारणांनी झालेल्या असमतोल विका
सामुळे पुणे-मुंबईसारख्या शहरांत मागासलेल्या भागातून व इतर शहरांतून गर्दीचा महापूर येत आहे. वाढलेल्या गर्दीमुळे शहरांतील सर्वच यंत्रणांवर ताण येत आहे. प्रदूषण, अतिक्रमणामुळे शहराच्या आजूबाजूच्या जैवविविधतेचे, पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान होत आहे. वाढत्या गर्दीचा ताण सार्वजनिक वाहतुकीवर येत आहे. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी ‘पीएमपीएमएल’च्या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. वाढत्या शहरीकरणात दूर उपनगरांत राहणार्‍या रहिवाशांना रोजच्या प्रवासासाठी नाईलाजाने दुचाकी, चारचाकी अथवा खासगी वाहने वापरावी लागत आहेत. 



पुणे पूर्वी सायकलींचे शहर होते. पेन्शनरांचे पुणे असे त्याची ओळख होती. आता मात्र आयटी हब आणि तरुणांचे पुणे झाले आहे. या शहरातील बरेचसे रस्ते हे पूर्वीच्या नियोजनानुसार आहेत. पण सध्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गे रस्ते अपुरे पडत आहेत. पर्यायाने वाहतुकीचा ताण वाढत आहे. अपघात, प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. पीएमपीएलची बससेवा सक्षम व सर्वदूर पोहोचल्यास वाहनांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकेल. या समस्येवर ‘सकाळ’ने आपल्या ‘पुणे बस दिवस’ या उपक्रमाद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. त्याद्वारे आगामी काळात ‘पीएमपीएमएल’ची सेवा अधिक सक्षम होऊन प्रदूषणमुक्त पुणे निर्माण व्हावे, हीच माझीही अपेक्षा आहे.



यानिमित्ताने काही गोष्टी आवर्जून सांगाव्या लागतील. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांतील गर्दीच्या नियोजनासाठी फ्लायओव्हर, मेट्रो रेल्वे, मोनो रेल आदी प्रकल्प राबवावे लागत आहेत. त्यासाठी उद्योग हे जिल्ह्या जिल्ह्यात, गावा-गावांत नेण्यात आले तर मोठ्या शहरात होणारे स्थलांतर थांबेल. शहरी-ग्रामीण भाग, गरीब-श्रीमंत, उत्पादक-ग्राहक व सुशिक्षित-अशिक्षितांत मोठी दरी आहे. ही दरी कमी करण्यासाठी निर्णायक पावले उचलावी लागतील. पाणी, रस्ते, दरडोई उत्पन्नाद्वारे ‘मानवी विकासाचा निर्देशांक’ ही संकल्पना या राज्यात आपण मांडली. हा निर्देशांक दहा वर्षांपूर्वीचा अथवा विभागनिहाय काढून चालणार नाही. तो तालुकानिहाय काढावा लागेल. राज्याच्या मागासलेल्या भागात उद्योजकांनी उद्योग उभारले पाहिजेत. त्याआधारे प्रादेशिक असमतोल भरून काढावा लागेल. तरच संबंधित भागात आपल्याला प्रयत्नपूर्वक दरडोई उत्पन्न वाढविता येईल. मागास भागांकडे उद्योजक आकर्षित व्हावेत, यासाठी सरकारला दूरदृष्टीने नियोजनपूर्वक पावले टाकावे लागतील. रस्ते, पाणी, वीज बाजारव्यवस्था चांगल्या होणं गरजेचं आहे. नैसर्गिक संपत्तीचा चांगला वापर करण्याची गरज आहे. 



औद्योगिकीकरणामुळे परिसरातील रहिवाशांची आर्थिक उन्नती होऊ लागते. त्यांची मुले शिकू लागतात. राहणीमान उंचावते. तथापि, प्रत्येक चांगल्या गोष्टीला काही उणिवांच्या बाजू असतात, त्याचप्रमाणे या विकासालाही काही मर्यादा आहेत आणि त्या आपण वेळीच जाणून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजेत. पाण्यामुळे काही ठिकाणी शेतीचा विकास होत असताना आता उद्योगधंद्यांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. त्यासाठी आता शेतकर्‍यांना कमी क्षेत्रात जास्त आणि बाजारात गुणवत्तेत कुठेही कमी पडणार नाही अशी पिके घेण्याचे कसब अंगिकारणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना नवनव्या तंत्रांचा वापर करता आला पाहिजे. काही परिसरात पाणी नाही, अन् काही परिसरात इतका पाण्याचा वापर आपण करतो, की आता जमिनी क्षारयुक्त व्हायला लागल्या आहेत. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी कोरडवाहू जमिनी तरी ठेवल्या होत्या. आम्ही मात्र पुढच्या पिढ्यांसाठी नापीक जमिनीच ठेवणार आहोत की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यावर सजगपणे उपाय करणे, ही आता काळाची खरी गरज आहे.