गणेशोत्सवाचे मांगल्य सर्वार्थाने जपावे...
गणेशोत्सव आता जवळ आलाय. यंदा अधिक मासामुळे हा उत्सव थोडा उशिराच येत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात करून देशबांधणीचे अन् सामाजिक एकोप्यासाठी बहुमोल कार्य केले. त्यानंतर गेल्या सुमारे शंभर वर्षांत या उत्सवाच्या स्वरुपात अनेक बदल झाले. सध्या या उत्सवाला आलेले भडक स्वरूप, होणारे ध्वनिप्रदूषण आणि इतर गैरप्रकार पाहता मूळ संकल्पनेपासून हा उत्सव फारकत घेतो की काय, अशी भीती मनात उत्पन्न होते.
आपल्याकडे प्रत्येक मंगलकार्याची, शुभकार्याची सुरवात श्री गणेशाला वंदन करून होते. आबालवृद्धांचे आवडते असे हे दैवत. अशा या आपल्या आवडत्या दैवताच्या उत्सवाचीही आपण सर्व वाट पाहत असतो. पण हा उत्सव साजरा करत असताना त्यामागच्या मूळ संकल्पनेचा आपल्याला विसर पडता कामा नये.
यंदा तर सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना अत्यंत साधेपणाने सर्वच मंडळांनी हा उत्सव साजरा करण्याची गरज आहे. जमा झालेल्या वर्गणीचा उपयोग मंडळांना समाजोपयोगी उपक्रमांसाठी करता येईल. तसा विचार प्रत्येक मंडळाने करावा, असे वाटते. काही मंडळे वर्गणी खंडणी गोळा करावी तशी जमा करतात. अशा दहशतीच्या मार्गाने हा उत्सव आनंदात साजरा कसा होणार? मंडळांचे मंडप रहदारीला अडथळा होणार नाही, असे उभारावेत. दहशतवादी घटनांचे सावट सर्वत्र आहे. त्यामुळे पोलिस व अन्य सुरक्षायंत्रणांवर ताण येत आहे. त्यामुळे उत्सवकाळात गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तूच्या स्वरुपांत स्फोटके पेरण्याचा धोका असतो. मंडळांसह सर्वच नागरिकांनी याबाबत अत्यंत सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. हा उत्सव गणेशासारख्या मांगल्याचे प्रतीक असलेल्या ओंकारस्वरूप दैवताचा आहे.
त्यामुळे मंडपातच जुगार, पत्त्यांचे आणि दारुचे अड्डे जमविणार्या कार्यकर्त्यांनी सामाजिक, आध्यात्मीक आणि आत्मीक भान बाळगून हे गैरप्रकार टाळावेत.
हा उत्सव साजरा करताना पर्यावरणरक्षणाचीही आपली जबाबदारी आहे. या उत्सवासाठी पर्यावरणपूरक पर्याय अवलंबिले पाहिजेत. पर्यावरणजतनासाठीचे उपाय अवलंबताना अगदी गणेशमूर्तीपासूनच सुरवात करण्याची गरज आहे. पूर्वी गणेशमूर्ती आकाराने आणि उंचीने छोट्या असत. आता मात्र अधिकाधिक उंच मूर्ती आणण्यासाठी
मंडळांमध्ये चढाओढ लागते. अशा
मूर्तींच्या विसर्जनानंतर जलाशयातील प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते. या
मूर्ती शाडूऐवजी मोठ्या प्रमाणात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या असतात. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ पाण्यात विरघळत नसल्याने प्रदूषण तर होतेच तसेच या मूर्ती हलक्या असल्याने बुडत नाहीत अन् खंडित स्वरुपात उघड्यावर येतात. आपल्या दैवताच्या मूर्तीची असे विसर्जन कुणालाच पटणारे नाही. त्यामुळे एक तर शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अन्यथा या
मूर्तींचे विसर्जन टाळावे. अन्य छोट्या
मूर्तीचे प्रतिकात्मक विसर्जन करावे.
काही मंडळे दर वर्षी धातूची अथवा लाकडाच्या एकाच कायमस्वरुपी
मूर्तीची उत्सवकाळात प्रतिष्ठापना करतात. अन् सुपारीरुपी गणेशाची विधिवत पूजा करून त्याचे विसर्जन करतात. बहुसंख्य
मंडळांनी असेच केल्यास गणेश
मूर्ती विसर्जनाचे प्रमाण घटण्यास नक्कीच मदत होईल. ‘एक गाव एक गणपती’प्रमाणे शहरांतही ‘एक गल्ली एक गणपती’ अथवा ‘एक सोसायटी एक गणपती’ असे
उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची संख्या कमी होऊ शकेल.
गणेशोत्सवात आकर्षक देखावे-रोषणाई करण्यात येते. या देखाव्यांसाठी तसेच रोषणाईसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. ग्रामीण भागात वीजटंचाई असताना विजेचा असा अपव्यय परवडणारा नाही. त्यामुळे तो कमी करण्यासाठी ‘सीएफएल’ अथवा ‘एलईडी’सारख्या दिव्यांचा वापराद्वारे रोषणाई करून वीजबचत करण्याची गरज आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत असते. ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकांद्वारे ध्ननिमर्यादेचे उल्लंघन सर्रास होत असते. या ध्वनिप्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर होत असतो. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बालके, गर्भवती महिलांवर याचे दुष्परिणाम होत असतात, याचे भान मंडळांनी ठेवावे. त्याच प्रमाणे गणेशोत्सवाच्या मिरवणुकांत गुलाल उधळतात. त्यातील रसायनेही प्रकृतीस घातक असतात. डोळे, त्वचाविकार आणि श्वसनाचे विकार त्यामुळे होतात. गुलालाला पर्याय म्हणून गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करता येईल. डीजे अन् स्पीकर्सच्या मोठमोठ्या भिंती टाळून
मोजक्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून हा उत्सव साजरा करता येणे शक्य आहे.
सरते शेवटी गणेश विसर्जनाबाबतीत एक आवर्जून सुचवावेसे वाटते. नद्या आणि जलाशयांत प्रदूषण वाढत आहे.
सध्याचे दुष्काळाचे वातावरण पाहता जलाशयांतही पाणी मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. अशा काळात घातक रसायनांपासून तयार केलेल्या रंगांनी रंगविलेल्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या लाखो मूर्ती या नद्या, तळ्यांत अन् विहिरींत विसर्जित केल्या तर हे पाणी पिण्याजोगे अथवा वापरण्याजोगेही राहणार नाही. जलाशयांतील मासे व अन्य जलचरांच्या जीवालाही त्यामुळे धोका पोहोचतो. सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळात तर हे परवडणारेच नाही. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलाशयांत (विसर्जन हौद) करता येईल. घरच्या घरी बादलींतही या मूर्ती विसर्जित करून विरघळलेल्या मातीयुक्त पाण्याचा वापर अंगणातल्या झाडांसाठी करता येईल. निर्माल्य जलाशयात विसर्जित न करता ते मोठ्या प्रमाणावर एकत्र करून त्यापासून उत्तम खतनिर्मितीही करता येते. त्याचे प्रशिक्षणही मंडळांतर्फे देता येईल. सर्वच मंडळांनी यावर कृतिशील निर्णय घेणे, हीच काळाची खरी गरज आहे. असे सर्व काळाला अनुसरून विधायक उपक्रम राबविले तर या मंगलमूर्तीच्या उत्सवात खर्या अर्थाने मांगल्य, पावित्र्य जपले जाईल. आपल्या निसर्गाचे रक्षणही होईल. पर्यायाने समाजाचे म्हणजेच तुमचे आमचेही
हितरक्षणही त्यातच आहे.